साऊदम्पटन इथे न्यूझीलंडविरुद्ध भारत फायनलवर कोरोनाचं संकट ? 

साऊदम्पटन इथे न्यूझीलंडविरुद्ध भारत फायनलवर कोरोनाचं संकट ? 

मुंबई, (प्रबोधन न्यूज) -  भारतात कोरोना उद्रेकामुळे दररोज 2 लाखांच्या आसपास रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे अनेक देशांनी भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. भारतात जाण्यास किंवा भारतातून येण्यास निर्बंध घातले आहेत. त्याचाच फटका टीम इंडियाला बसण्याची शक्यता आहे. इंग्लंडने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. त्यामुळे ब्रिटनने भारताच्या सर्व प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातून इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन सक्तीचं केलं आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला जून महिन्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी मैदानात उतरायचं आहे. साऊदम्पटन इथे न्यूझीलंडविरुद्ध भारत अशी फायनल होणार आहे. मात्र या फायनलवर आता कोरोनाचं संकट आहे.

भारतात कोरोना उद्रेक असला, तरी ICC निर्धारित वेळेतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवण्यावर ठाम आहे. 'इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि दुसऱ्या बोर्डांनी कोरोना संकटात संपूर्ण सुरक्षितपणे फायनलचं नियोजन करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या वेळेतच होईल. सध्या आम्ही इंग्लंड सरकारशी रेड लिस्टमधील देशांवर असलेल्या प्रभावाबाबत बातचीत करत आहोत. भारतीय महिला संघही जून महिन्यात यूके दौऱ्यावर आहे. तर पुरुष संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे', असं आयसीसीने म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोरोनो संकटात काही नियम सैल केले आहेत. खेळाडूंना क्वारंटाईन राहावं लागतं, काहींना संसर्ग होऊ शकतो त्यामुळे अतिरिक्त खेळाडूंना दौऱ्यावर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 7 अतिरिक्त खेळाडू, सपोर्ट स्टाफला दौऱ्यावर नेण्यास परवानगी असेल. त्यामुळे भारतीय टीम जून महिन्यात होणाऱ्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी 30 जणांच्या ताफ्यासह इंग्लंडला रवाना होऊ शकते.